श्रीबल्लाळेश्वर गणपती

Payal Bhegade
05 Apr 2023
Devotional

पालीचा श्रीबल्लाळेश्वर गणपती .

बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.

आख्यायिकेनुसार ही त्रेता युगातील कथा आहे. पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी त्याची पत्नी इंदुमती बरोबर राहत होता. त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता. बल्लाळ हा मोठा गणेशभक्त होता. तो त्याच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करीत असे. एके दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा आढळून आला. बल्लाळाच्या आग्रहामुळे मुळे त्या धोंड्याला गणपती मानून त्याची पूजा करू लागले. ती मुले गणेशभक्तीमध्ये इतकी गुंग होऊन जायची की त्यांना तहान-भूक, दिवस-रात्र कशाचेही भान उरत नसे.

सर्व मुलांचे पालक त्यांच्या परतण्याची वाट बघत होते. जेव्हा मुले परत आली नाहीत तेव्हा सर्व पालक बल्लाळचे वडील कल्याण याच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाळाची तक्रार केली. त्यामुळे कल्याण क्रोधीत झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला निघाला. त्याला मुले गणेश पुराण ऐकत असलेली सापडली आणि त्याला त्याचा क्रोध अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने काठी घेऊन मुलांनी बांधलेले ते छोटेसे देऊळ तोडून टाकले. त्याने बल्लाळाला रक्तबंबाळ होईपर्यंत बदडून काढले. त्याने बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य त्याने फेकून दिले. ज्याला मुले गणपती म्हणत होती, ज्याची पूजा करीत होती त्या भल्या मोठ्या धोंड्यालासुद्धा त्याने फेकून दिले. कल्याण म्हणाला, “आता बघू या कोणता देव तुझे संरक्षण करतो ते.” असे म्हणून तो घरी निघून गेला.

जरी बल्लाळाला शारीरिक जखमा, तहान आणि भूक याचा त्रास होत होता तरी त्याने त्याची शुद्ध हरपेपर्यंत गणेशजप चालूच ठेवला. त्याची अशी भक्ती बघून गणपती द्रवला आणि तो ब्राम्हणाचा वेश घेऊन बल्लाळाकडे आला. त्याने बल्लाळाला स्पर्श केला. बल्लाळाची तहान आणि भूक नाहीशी झाली, त्याच्या जखमा भरून आल्या. बल्लाळाने ब्राम्हणाच्या वेशात आलेल्या गणपतीला ओळखले आणि त्याने देवाच्या पायावर लोटांगण घातले. तेव्हा गणपतीने त्याला एक वर मागण्यास सांगितले. बल्लाळाने गणपतीला तिथेच राहण्याची विनंती करत लोकांची दुःखे दूर करण्यास सांगितले. गणपती म्हणाला, “माझा एक अंश इथेच राहील, माझ्या नावाआधी तुझे नाव घेतले जाईल. इथे मला लोक बल्लाळ विनायक यानावाने बोलावतील.” गणपतीने बल्लाळाला आलिंगन दिले आणि तो जवळच्या धोंड्यात लुप्त झाला. त्या धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीश्या झाल्या आणि तो पुन्हा अखंड झाला. त्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो. कल्याण वाण्याने जो दगड फेकून दिला होता त्यालासुद्धा धुंडीविनायक असे संबोधिले जाते. ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी केल्या जाते.