रांगणागड किल्ला

Payal Bhegade
26 Apr 2024
Fort

पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेला अथांग अरबी समुद्र. या दोघांच्या मध्ये कोकण प्रदेश वसला आहे. या प्रदेशात फिरताना निसर्गसौंदर्य तर डोळ्याला भावतेच, त्याशिवाय सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दुमदुमलेला व अरबी समुद्राच्या लाटा-लाटांवर उसळणारा इतिहास साद घालतो. तो केवळ इथले गिरिदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट यांच्या अस्तित्वामुळेच. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरताना येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर १४ गिरिदुर्ग पाहायला मिळतात. आपल्या देशात आपलेच राज्य असावे, या हेतूने प्रेरित होत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या रक्षणासाठी हजारो मावळे सरसावले. महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील उंच उंच शिखरांवर गिरिदुर्ग म्हणजे मुके मावळ

च उभे केले. काही गिरिदुर्ग जिंकून घेतले. त्यापैकी एक असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माणगाव खोऱ्यातील रांगणागड हा आहे.

कुडाळ तालुक्यातील नारूर मुक्कामाहून रांगणागडावर जायला पायवाट आहे. भयाण जंगल, दगडधोंडय़ांतील पायवाट, जंगली पशूंचा वावर या संकटांवर मात करत रांगणागड गाठावा लागतो. वाटेत जर लक्ष चुकून तुमचा पाय घसरल्यास १०० ते १५० फूट तुम्ही खालीच गेला समजा. या गडावर जायचं म्हणजे दांडगी इच्छाशक्तीच हवी. तब्बल २ तासांनंतर गडावर पोहोचता येते. गडाची तटबंदी पूर्णपणे ढासळलेली आहे. जुना दिंडी दरवाजादेखील अर्धवट उभा आहे. दिंडी दरवाजातून आतमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला पाण्याची विहीर लागते. थोडंसं पुढे चालत गेल्यावर दुसरा एक दरवाजा लागतो. या दरवाजाचं नक्षीकाम फारच सुंदर आहे. दरवाजातून पुढे गेल्यानंतर मोठा तलाव पाहायला मिळतो. या तलावात वर्षांचे बाराही महिने मुबलक पाणी असते. तलावाच्याच काठावर पश्चिमेला भग्नावस्थेतील शंकर मंदिर आहे, तर थोडंसं पुढे रांगणाई देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरील नक्षीदार दीपमाळ लक्ष वेधून घेते. या दीपमाळेचे बांधकाम काळ्या दगडाचे आहे. मंदिर छोटेसेच आहे; परंतु वादळात मंदिराची इमारत केव्हाही पडेल, अशी अवस्था या वास्तूची झालेली आहे. या मंदिराच्या बाजूला हनुमान मंदिरदेखील आहे. रांगणागड भेटीच्या निमित्ताने या गडावर एक दिवस वास्तव्य करण्याचा योग आला. संपूर्ण गडावर फिरताना या गडाच्या चारही बाजूला पाहिल्यास नजरेत मावणार नाही एवढा दूरवरचा प्रदेश दिसतो. या गडाचा नेमका इतिहास काय याचा शोध घेता घेता संदर्भ ग्रंथांमधून जी माहिती समोर आली ती रोमांचित करणारी होती.

हा गड शिलाहार घराण्यातील दुसरा भोज राजाने उभारला आहे. इ. स. ११७५ ते १२१२ हा या राजाचा कालावधी आहे. यावरून हा गड ८०० वर्षांहूनही अधिक काळापूर्वीचा आहे, हे लक्षात येते. शिलाहारांची पन्हाळा ही राजधानी होती. राजा दुसरा भोजने आपल्या कारकीर्दीत १५ किल्ले उभारले. त्यापैकी रांगणागड हा शिवाजी महाराजांनी जिंकून घेऊन स्वराज्यात सामील केला. प्रतापगडावर १० नोव्हेंबर, १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. यानंतर १८ दिवसांनी म्हणजे २८ नोव्हेंबर १६५९ रोजी महाराजांनी पन्हाळा जिंकून घेतला. पुढे पावणगड, वसंतगड व विशालगडाबरोबरच रांगणागडही जिंकून घेतला. १६९५ मध्ये रांगणागडावर राजाराम महाराजांना राज्याभिषेक करण्यात आला होता. ९ डिसेंबर, १८४४ साली हा गड इंग्रजांनी ताब्यात घेतला. अत्याधुनिक तोफांच्या माऱ्यात गडावरील इमारती व तटबंदीचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूरच्या पन्हाळगडापासून हा किल्ला ५० मैलांवर आहे, तर समुद्र सपाटीपासूनची याची उंची ३००० फूट आहे.